

देशातील कोणत्या कोपऱ्यात मुली, महिला सुरक्षित आहेत, असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. कारण मुंबईतील नालासोपाऱ्यात एक मन सुन्न करणारी घटना घडली. नालासोपाऱ्यात एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याची घटना समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पीडितेची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून कथित आरोपीशी झाली. ओळख कालांतराने मैत्रीत बदलली आणि त्यांनी भेटण्याची योजना आखली. पण आपण ज्या मुलाला भेटत आहोत, त्या एका भेटीमुळे काय होईल याची कल्पना पीडितेला नव्हती. मुलगी ठरलेल्या ठिकाणी गेली…
पण त्याठिकाणी फक्त तिचा मित्रच नाही तर अन्य एक मुलगा देखील उपस्थित होता, समोर येत असलेल्या माहितीनुसार, दोन्ही कथित आरोपी अल्पवयीन आहेत. दोघांनी मुलीच्या पेयात नशेचं औषध मिसळलं आणि तिच्यावर अत्याचार केले. दोघांनी घटनेचं शुटिंग केलं आणि सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केल्याची माहिती देखील समोर येत आहे..
समोर येत असलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला व्हिडीओ मुलीच्या मामाच्या हाती लागला आणि कुटुबिंयांनी नेमकं काय घडलं? याची विचरणा मुलीकडे केली, तेव्हा मुलीने घडलेला संपूर्ण प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर मुलीसह कुटुंबियांनी पोलीस स्थानक गाठलं आणि तुळींज पोलीस ठाण्यात दोन आरोपीवर सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.
तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कथित आरोपींना अटक केली आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना भिवंडी येथील बालसुधार गृहात ठेवण्यात आलं आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण घडलेल्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
सांगायचं झालं तर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत दिवसागणिक मोठी वाढ होत आहे. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी हा जवळचाच व्यक्ती असतो. शिवाय सोशल मीडियावर झालेल्या मैत्रीच्या आधारावर अनोळखी व्यक्तीला भेटणं देखील धोक्याचं ठरू शकतं. कारण सोशल मीडियामुळे फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामुळे आपण सावधगिरी बाळगली तर, योग्य ठरेल. त्यामुळे कोणावर डोळेबंद करुन विश्वास ठेवण्यापूर्वी एकदा विचार नक्की करा.

