

मीरा- भाईंदर ते वसई-विरार मेट्रो १३ मार्गिकेला राज्य सरकारने मंजूरी दिली असून या २५.०३ किमीच्या या मार्गिकेसाठी १७,७२४ कोटी रुपयाच्या खर्च येणार असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून ही मार्गिका जाणार असून मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांचा प्रवासाचा अर्धा वेळ ही मेट्रो-१३ वाचविणार आहे. या मार्गिकेचा २१.७८ किमीचा मार्ग एलिवेटेड तर ३.२५ किमीचा मार्ग भुयारातून जाणार असून साल २०३१ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याची एमएमआरडीएची योजना आहे. तसेच पुण्याच्या सोरतापवाडी ते वरवे-शिवरे विभागात रिंग रोडलाही मान्यता देण्यात आली असून यासाठी १०,५०२.३६ कोटीच्या खर्चाला मंजूरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पुण्याच्या सोरतापवाडी ते वरवे-शिवरे विभागात पुणे रिंग रोडमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाचा सुधारित खर्च १०,५०२.३६ कोटी आहे. पूर्व विस्तारामुळे पुणे रिंग रोड पूर्वेतील वाहतूक मोकळी होईल, या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (MSRDC) करण्यात येणार आहे. या प्रकल्पात सोरतापवाडी ( वळाटी ) ते पुणे-सोलापूर ते वारवे ( बुद्रुक ) शिवरे या पुणे-सातारा रोडपर्यंत ३१.८०५ किमीचा एक्सेस कंट्रोल एक्स्प्रेसवे बांधण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
प्रवासाच्या वेळेची निम्म्याने बचत
या नव्या क्रांतीकारक प्रकल्पामुळे अधिक वेगवान, उत्तम संपर्क व्यवस्था असलेला आणि भविष्यासाठी सज्ज महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक निर्णायक पाऊल ठरले आहे. त्याचबरोबर, यामुळे नागरिकांचा प्रवासाच्या वेळेची निम्म्याने बचत होईल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि शहरी जीवनमानाचा दर्जा सुधारेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

