

उत्तराखंडमधून मोठी बातमी समोर आली आहे. चमोली जिल्ह्यातील मायापूर परिसरातील निर्माणाधीन बोगद्यात अचानक पाणी आणि चिखल शिरल्याने खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे 7:05 वाजता बोगद्यात अचानक पाण्याचा आणि चिखलाचा प्रवाह आला. यावेळी बोगद्याच्या आत अनेक 18 ते 19 मजूर काम करत होते. पाणी आणि चिखल शिरल्यानंतर काही मजूर आतच अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि बचाव पथके सक्रिय झाली. सुरुवातीच्या माहितीनुसार, बोगद्याच्या आत 18 ते 19 जण अडकल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, बचावकार्य पुढे सरकत असताना मोठ्या संख्येने मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. प्रशासनाच्या ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत 16 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. उर्वरित लोकांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
अचानक चिखल आणि पाण्याचा प्रवाह…
समोर आलेल्या माहितीनुसार, बोगद्याच्या आत मजूर बांधकामाच्या कामात व्यस्त होते. त्याचवेळी अचानक पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू झाला. पाहता पाहता बोगद्याच्या काही भागात पाणी आणि चिखल साचला. त्यामुळे काम करणाऱ्या मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अनेक मजूर बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने स्थानिक प्रशासनाला माहिती देण्यात आली. पोलीस आणि प्रशासनाची पथके घटनास्थळी पोहोचली आणि आत अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले.
बोगद्यात अडकलेल्या मजुरांची संख्या किती आहे, याबाबत वेगवेगळी माहिती समोर आली. सुरुवातीला 18 ते 19 जण अडकल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर काही अपडेटमध्ये 6, 7 आणि त्यानंतर 8 मजुरांना बाहेर काढल्याची माहिती देण्यात आली. बचावकार्य सातत्याने सुरू राहिल्यानंतर प्रशासनाने 16 जणांची सुखरूप सुटका केल्याचे सांगितले आहे. आता बोगद्यात असलेल्या उर्वरित लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे हे प्रशासनाचे प्राधान्य आहे.
सेना, NDRF आणि SDRF बचावकार्यात व्यस्त
बचावकार्य वेगाने पूर्ण करण्यासाठी अनेक यंत्रणांना घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांसोबत SDRF, NDRF, ITBP आणि लष्कराची पथकेही बचावकार्यात सहभागी झाली आहेत. याशिवाय स्थानिक पोलीस, CISF आणि इतर संबंधित पथकेही घटनास्थळी उपस्थित आहेत. बोगद्याच्या आतील परिस्थिती लक्षात घेऊन बचाव पथके अत्यंत सावधगिरीने पुढे जात आहेत. पाणी आणि मलब्यामुळे बचावकार्याचे आव्हान वाढले आहे. मात्र, सर्व पथके सातत्याने काम करत आहेत.

