तुकाराम मुंढे यांची आणखी एक मोठी कारवाई, ‘तारक मेहता’मधील माधवीच्या अचार-पापड व्यवसायावर FDAची रेड, रद्द होणार परवाना

तुकाराम मुंढे यांची आणखी एक मोठी कारवाई, ‘तारक मेहता’मधील माधवीच्या अचार-पापड व्यवसायावर FDAची रेड, रद्द होणार परवाना

गेल्या अनेक दिवसांपासून टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये यावेळी फूड सेफ्टीसारखा गंभीर सामाजिक मुद्दा विनोदी आणि रंजक पद्धतीने मांडण्यात आला आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये माधवी भिडे यांच्या अचार-पापडाच्या व्यवसायावर संकट ओढवल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रोमोनुसार, FDAचे दोन अधिकारी आत्माराम तुकाराम भिडे यांच्या घरी अचानक पोहोचतात. माधवी भिडे यांच्या लिंबू आणि मिरचीच्या लोणच्यात काचेचा तुकडा आढळल्याचे सांगत अधिकारी त्यांच्या व्यवसायाचा परवाना रद्द करण्याची कारवाई करतात. या प्रकारामुळे भिडे कुटुंबाला मोठा धक्का बसतो. आपला व्यवसाय अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे चालवत असल्याने माधवीही या आरोपामुळे खचून जातात.

भिडेच्या घरी FDAचे दोन अधिकारी

माधवी भिडेच्या घरगुती व्यवसायासोबतच भिडे यांची शिकवणी हे कुटुंबाच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे परवाना रद्द झाल्याने त्यांच्या कुटुंबासमोर आर्थिक अडचणीचेही संकट उभे राहते. या प्रसंगी गोकुळधाम सोसायटीतील जेठालाल, बापूजी आणि इतर सदस्य भिडे कुटुंबाच्या मदतीला धावून येताना दिसणार आहेत.

शोमधील हा ट्रॅक सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या अन्न भेसळविरोधी कारवाईशी जोडला जात आहे. महाराष्ट्र FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अन्नसुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तपासण्या आणि कारवाया सुरू केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ‘तारक मेहता’च्या कथानकातूनही सध्याच्या परिस्थितीचे प्रतिबिंब पाहायला मिळत आहे.

गेल्या 18 वर्षांपासून मालिका सुपरहिट

दरम्यान, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजनेही शूटिंग सेटवरील कॅटरिंग व्यवस्थेची तपासणी करण्याची मागणी FDAकडे केल्याचे समोर आले आहे. शूटिंगच्या ठिकाणी मोठ्या संख्येने कलाकार आणि कर्मचारी जेवण करत असल्याने अन्नाच्या गुणवत्तेबाबत खबरदारी घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चा पहिला भाग जुलै 2008 मध्ये प्रसारित झाला. जवळपास 18 वर्षांचा प्रवास पूर्ण केलेल्या या मालिकेने 4700 हून अधिक भागांचा टप्पा गाठला आहे. जेठालाल, भिडे, बापूजी यांसारखी पात्रे आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. आता भिडे कुटुंब या नव्या संकटातून कसे बाहेर पडणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *