

ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू असून तीन दिवसांचा खेळ संपला आहे. तीन दिवसांचा खेळ संपला असून तिसऱ्या दिवसावरही बांगलादेशने अधिराज्य गाजवलं. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर असून चौथा दिवस निर्णायक ठरणार आहे. बांग्लादेश कसोटी सामना जिंकेल अशी स्थिती आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची उत्सुकता वाढली आहे. चौथ्या दिवशी काय होणार याकडे नजरा खिळल्या आहेत. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ 198 धावांवर सर्वबाद झाला होता. दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने 1 गडी गमवून 96 धावा केल्या. तसेच दुसऱ्या दिवशी बांगलादेशी खेळाडूंनी गाजवला आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पहिल्या डावात 6 गडी गमावून 351 धावा केल्या. तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात फलंदाजी करताना 75 धावांची भर घालत 426 धावा केल्या. यासह पहिल्या डावात 228 धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमवून 161 धावा केल्या आणि 67 धावांनी पिछाडीवर आहेत. कॅमरून ग्रीन नाबाद 43 आणि एलेक्स कॅरे नाबाद 19 धावांवर खेळत आहेत.
पहिल्या डावात बांगलादेशने 228 धावांची घेतलेली आघाडी मोडून काढण्याचं आव्हान ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर आहे. त्यामुळे या धावा केल्यानंतर बांगलादेशपुढे विजयी आव्हान देता येईल. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांना झुंजार खेळीशिवाय पर्याय नाही. पण या धावांची आघाडी मोडून काढताना आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. जेक वेदराल्डला तर खातंही खोलता आलं नाही. ट्रेव्हिस हेड 17 धावा करून बाद झाला. मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मार्नस लाबुशेन 31, तर स्टीव्ह स्मिथ 44 धावा करून बाद झाला.
दुसऱ्या डावात हसन महमूदची गोलंदाजी प्रभावी ठरली. त्याने 2 विकेट काढल्या. तर तैजुल इस्लाम आणि मेहिदी हसन मिराजने प्रत्येकी एक विकेट घेतली. चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना झटपट बाद करण्यात बांगलादेशी गोलंदाजांना यश आलं तर या सामन्यावर बांग्लादेश पकड मिळवेल. त्यामुळे चौथ्या दिवसांचं महत्त्व वाढलं आहे. तिसऱ्या दिवसापर्यंत तरी बांगलादेशने पकड मिळवली आहे.
बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवल्यास क्रिकेट विश्वात अनेक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित होईल. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात कसोटीत हरवण्याची बांगलादेशची ही इतिहासातील पहिलीच वेळ असेल. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा केवळ दुसरा विजय ठरेल. यापूर्वी 2017 मध्ये ढाक्यात ऑस्ट्रेलियाला 20 धावांनी नमवलं होतं.

